
कोपरगाव प्रतिनिधी
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुरुवारी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे गेल्या २० ते २२ वर्षांपासून आपला वाढदिवस हार-तुरे, शाल, भेटवस्तू व सत्कार न स्वीकारता वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, आरोग्य शिबीर यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद शाळेमध्येही गुरुवारी (१३ जुलै २०२३) मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, भाजप दिव्यांग मोर्चाचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, चिमाजी दैने, रामभाऊ कासार, योगेश परजणे, दिनेश बोरनारे, कारभारी भाकरे, प्रभाकर भाकरे, प्रदीप लोखंडे, अनुप शिंदे, अनिल भाकरे यांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थिनींना यांच्या हस्ते मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जनता इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर. एस. मोरे, पर्यवेक्षक एस. आर. अंबिलवादे, शिक्षक जी. बी. खेताडे, बी. के. ढोले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भागवत कर्पे, पर्यवेक्षक एफ. के. पठाण व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून साथीचे आजार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी सचिन जोशी व सचिन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
ज्ञानेश्वर परजणे यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी संवत्सर व परिसरात केलेल्या विविध विकास कामांचा यावेळी विशेष उल्लेख केला. संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंबीय संकटाच्या वेळी नेहमीच जनतेच्या मदतीला धावून येतो. स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी संवत्सर परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गणेश बंधारा बांधला. या भागात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य लोकांचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. पाटपाण्याचा प्रश्न सोडविला. संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली. त्यांनी केवळ संवत्सर परिसराचाच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव तालुक्याचा कायापालट घडवला. स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्याप्रमाणेच संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिपीनदादा कोल्हे यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असून, त्यांनी तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत.
स्व. शंकरराव कोल्हे साहेब व बिपीनदादा कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी समाजकारण व राजकारणात अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. कोव्हिड महामारी, अतिवृष्टी, महापूर व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी भरीव मदतकार्य केले आहे. काळाची पावले ओळखून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात अनेक नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबवून कारखान्याचा नावलौकिक वाढविला आहे. सभासद शेतकरी, अधिकारी व कामगार यांच्या सहकार्याने कारखान्याची आणखी प्रगती करण्याचा त्यांचा मानस आहे. कोव्हिड काळात जनता इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले. तसेच शाळेचा नावलौकिक वाढविला, असे सांगून परजणे यांनी शिक्षकांची स्तुती केली.
मुख्याध्यापक आर. एस. मोरे यांनी प्रास्ताविकात बिपीनदादा कोल्हे व कोल्हे कुटुंबीयांच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, सिंचन क्षेत्रातील कार्याची प्रशंसा केली. बिपीनदादा कोल्हे हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करतात. त्यांचा हा उपक्रम खरोखर प्रशंसनीय व आदर्शवत असल्याचे मोरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन एस. के. वाघमारे यांनी केले.


