
जेऊर कुंभारी वार्ताहर
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने अनेक हिंस्र वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होत असून यामुळे त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला असून याचाच प्रत्येक कोपरगाव तालुक्याला दररोज कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्याचे दर्शन होऊन येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कायम दहशतीचे वातावरण असते तर वनपरिक्षेत्रधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होताना पहावयास मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या महिन्यात कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख या गावात तर दोन-चार दिवसापूर्वी टाकळी गावात असलेला बिबट्या पकडण्यात वन विभागाला मोठे यश आले असताना त्यांनी सुटकेचा श्वास सोडला असतांना शुक्रवार दि २३ जुन रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जेऊर कुंभारी परिसरातील अविनाश रेवजी आव्हाड व शाम रेवजी आव्हाड यांच्या अडीच एकर उसाचा क्षेत्रात बिबट्या व रानडुकरांची झटापट सुरू असताना या झटापटीत बिबट्याने रानडुकरला ओडून नेताना काही स्थानिकांनी बघितले तर या झटापटीत अविनाश व शाम आव्हाड या शेतकऱ्यांच्या दोन गुंठे उसाचे देखील मोठे नुकसान झाले असून यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी अविनाश आव्हाड, शाम आव्हाड, विक्रम शिंदे, सतीश देवकर, सखाराम दांदडे, किरण आव्हाड, सुनील आव्हाड, द्वारकानाथ दांदडे, दिलीप आव्हाड, समाधान गुडघे, विजय शिंदे, प्रसाद वक्ते आदींनी केली आहे.
चौकट:-
एक तरी पिंजरा उपलब्ध करा
वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर बघता त्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडे अत्यंत अल्प प्रमाणात पिंजरे आहे. ते देखील अनेकदा मागणी करून वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान एक तरी पिंजरा उपलब्ध करून द्यावा. अशी देखील मागणी सरपंच सुवर्ण पवार यांनी केली आहे.


