
(लेख)
पप्पांचा जन्म ०५/१०/१९५१ सालचा आजोळ आणि मुळगाव जेऊर कुंभारी, प्राथमिक शिक्षण जेऊर कुंभारी तीन चारी शाळेत व माध्यमिक शिक्षण कोपरगावात मॅट्रिक पर्यंत झाले. सुरुवातीपासून शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून शेती करण्यास सुरुवात केली. शेतीची कोणतीही डिग्री नसतात ते कोपरगाव तालुक्यात उत्कृष्ट व प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित होते. शेतीचे बाळकडू त्यांना वडील कोंडाजी नाना व आई भागीरथी बाई यांचे कडून मिळाले. त्याकाळी चेन चे ट्रॅक्टर होते. स्वतःची शेती या ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून इतरांचीही शेतीची नांगरट मशागत ते मजुरीने करून द्यायचे. शेतीची त्यांना प्रचंड आवड होती.

आम्ही तीन बहिणी व एक भाऊ आई व आजी असा आमचा परिवार. पप्पांनी आम्हा सर्व भावंडांना उच्च शिक्षित केले व सर्वांना स्वतःच्या पायावर उभे केले. माझी मोठी बहीण वंदना आव्हाड ही होंग कोंग येथे स्थायिक असून मी इंटिरियर डिझायनर आहे व मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी करत आहे तीन नंबरची कांचन सोनकुसरे इंजिनीयर असून ती पण मुंबईत नोकरीत आहे भाऊ गौरव इंजिनियर आहे व मुंबईत बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. एका शेतकरी कुटुंबाला पप्पांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर फक्त शेती हेच उत्पन्नाचे साधन असताना सर्वांना स्वतःच्या पायावर उभे केले.

१९९२ सालामध्ये शिंगणापूर ता. कोपरगाव येथे ४ एकर क्षेत्रावर डाळिंब बाग स्वतःच्या ज्ञानावर अतिशय कष्ट करून अहोरात्र मेहनत करून फुलवली व त्यावेळी ४०० ते ६०० ग्राम वजनाचे एक फळ अशा फळांनी संपूर्ण बाग बहरून गेली होती त्यावेळी एकरी क्विंटल विक्रमी उत्पादन घेतले. माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब व स्व. नामदेवराव आण्णा यांनी डाळिंब बागेवर भेट देऊन पप्पांचा विशेष गौरव केला होता. पप्पांना सेंद्रिय शेतीची खूप आवड होती. गाई म्हशी आदी करून जनावरे तसेच पक्षी यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. १०-१५ मोरांचा कळप त्यांनी गेल्या १० वर्षांपासून पाळलेला होता. आजही ते सर्व मोर आमच्या अंगणात अन्नपाणी खाण्यासाठी येतात पप्पांनी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था केलेली होती. शेती पशुपक्षी यांचे आणि पप्पांचे एक अतूट असे नाते होते. म्हणूनच पप्पांनी शेवटच्या क्षणी “मला गाईच्या गोठ्यात घेऊन चला, मला गाईंजवळ थांबायचे आहे” असा आग्रह केला होता व आम्ही त्यांची ती इच्छा पूर्ण केल्याचे आम्हाला समाधान आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी शेती, डाळिंब, केशर आंबे याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी पप्पांकडे नेहमी येत असत. माझी आई लता हिची खूप खंबीर साथ पप्पांना आयुष्यभर लाभली. माझी भाऊजय गौरी हिने पप्पांची खूप सेवा केली.
प्रामाणिकपणा जिद्द व कष्ट ही पप्पांची शिकवण व शेतीचे प्रेम त्यांनी आम्हाला दिले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ४०० केशर आंब्याची रोपे व फुलझाडे यांचे वाटप करून आम्हा भावंडांची हीच पप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली…
….शब्दांकन
शितल राहुल सोनार
मुंबई


