Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासन आपल्या दारी' उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा !!-स्नेहलताताई कोल्हे

शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा !!-स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागू नये आणि शासकीय योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा क्रांतिकारी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत असून, कोपरगाव तालुक्यात २९ मे ते १ जून २०२३ या कालावधीत गावनिहाय ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या माजी प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.
स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले की, आतापर्यंत नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अथवा दाखले मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या. मात्र, आता शासन लोकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहे. त्यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा क्रांतिकारी निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा क्रांतिकारी उपक्रम असून, या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि समाजातील सर्वच घटकांचे सरकार असून, शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देत आहे. सरकारच्या वतीने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, विविध शासकीय योजना लोकाभिमुख करून या योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाद्वारे ऑफलाईनसह ऑनलाईन पध्दतीनेदेखील शासनाच्या अनेक योजनांमधील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शासन थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येत असल्याने अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर २९ मे ते १ जून २०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरास विविध शासकीय योजनांशी निगडीत शासकीय कार्यालयांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, मुख्याध्यापक, ओ.एल.बी., अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, आपले सरकार केंद्रचालक, महा-ई- सेवा केंद्रचालक, पोलिस, स्वस्त धान्य दुकानदार, महावितरणचे अधिकारी, पोस्टमन, बचत गटातील सदस्य आदींसह सर्व ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात नवीन आधारकार्ड काढणे/दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेवरील (रेशनकार्ड) नाव कमी करणे, नाव वाढविणे, नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी अर्ज स्वीकृती, जीर्ण/खराब शिधापत्रिका बदलणे, सामाजिक विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा/दीर्घकालीन आजार/दिव्यांगासाठीच्या योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा/दिव्यांग योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी एस. टी. बस प्रवासाचे पास, नवीन वीज कनेक्शन (घरगुती), कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण, नवीन मतदार नोंदणी करणे, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, प्रधानमंत्री उज्ज्वला २.० योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, दिव्यांगासाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, दिव्यांगासाठी आधार कार्ड नोंदणी करणे, पंतप्रधान आवास योजना (शहरी), पंतप्रधान स्वनिधी योजना (पथविक्रेत्यांना सहाय्य), जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, दिव्यांगासाठी उदरनिर्वाह भत्ता आदी सर्व योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ जनतेला देण्यासाठी जनतेपर्यंत जात आहेत. महसूल, ग्रामविकास, कृषी, नगरविकास अशा अनेक विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी या उपक्रमाद्वारे व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावात २९ मेपासून १ जूनपर्यंत शिबीर घेण्यात येणार असून, तालुक्यातील नागरिकांनी शिंदे-फडणवीस सरकारने हाती घेतलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!