

कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी २६ मे २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे. समृध्दी महामार्गामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. समृध्दी महामार्गाची निर्मिती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे, असे भाजपच्या माजी प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज, कोकमठाण येथे होणार आहे. यावेळी राज्याचे महसूल व पशुसंवर्धनमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ.प्रा. राम शिंदे, खा. सदाशिव लोखंडे, खा.डॉ. सुजय विखे पाटील, आ.मोनिकाताई राजळे, आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भाजप कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या तसेच विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर इतकी असून, देशातील सर्वाधिक लांबीचा हा वेगवान महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी फक्त पाच तासांतच कापणे शक्य झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत लाखो वाहनधारकांनी समृध्दी महामार्गाचा वापर केला आहे. आता समृद्धी महामार्गाच्या शिर्डी (जि.अहमदनगर) ते भरवीर (जि. नाशिक) या ८० कि. मी. लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन उद्या शुक्रवारी होत आहे. याचा मला विशेष आनंद आहे. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून, शिंदे-फडणवीस सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना दिल्याने समृद्धी महामार्गाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतिपथावर आहे. कोपरगाव तालुक्यातील ११ गावांच्या हददीतून समृद्धी महामार्ग गेला आहे. सन २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या त्या शेतकऱ्यांना पाचपट वाढीव मोबदला मिळावा, यासाठी आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व विधानसभेत सतत पाठपुरावा केला व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून दिला. समृद्धी महामार्गातील अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना करावी म्हणून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
हायस्पीड समृद्धी महामार्गामुळे उत्तम दळणवळण सुविधा उपलब्ध होणार असून, वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. व्यापार, उद्योग, पर्यटन व इतर क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. हा महामार्ग कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह अन्य भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरणार असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना या समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे औद्योगिक तसेच शेतीमालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होणार आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध होईल व यातून शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल. अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने,कृषी उद्योग,दूध व्यवसाय,भाजीपाला,फळे-फुले उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. या परिसरातील कृषी,उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भातील १० जिल्ह्यांशी प्रत्यक्ष व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाणार आहे. एका अर्थाने विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांनी समृध्दी महामार्ग उभारणीसाठी अपार कष्ट घेतले आहेत. त्याबद्दल ते सर्वजण निश्चितच कौतुकास पात्र आहेत, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.


