
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊरकुंभारी परिसरासाठी अत्यंत उपयोगी असे जलसाठवण तळे मंजूर झाले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेचे श्रेय कुणीही घ्या मात्र कामास आडकाठी नको असे आवाहन महारुद्रा फाऊंडेशनचे शशिकांत वक्ते यांनी केले आहे.
अनेक दिवसांपासून गावातील काही गावकऱ्यांच्या तसेच हनुमान देवस्थानच्या सर्व ट्रस्टींच्या प्रयत्नांतून जेऊरकुंभारी येथे पाच एकर क्षेत्राचे तळे हे मंजूर झाले आहे. त्याचे काम ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली सुरू झाले आहे. असे प्रकल्प किंवा योजना गांव विकासासाठी तसेच गावाच्या प्रगतीसाठी पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरतात. श्रेय कुणीही घ्या किंवा कोणालाही द्या परंतु तळ्याची योजना ही पूर्ण झालीच पाहिजे. ही योजना फक्त एक दिवसासाठी किंवा काही वर्षांसाठी नाही तर ती भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहे. असे प्रकल्प राबवण्यासाठी बरेच दिवस यंत्रणेला काम करावे लागते व त्यानंतर कामाला सुरुवात होते ही गोष्ट गावकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. चांगल्या गोष्टींचा विरोध कोणीच करू नये आणि जर विरोध होत असेल तर जेऊरकुंभारी गावातील गावकरी मंडळी हे नक्कीच तीव्र आंदोलनासाठी तयार राहतील. चांगले प्रकल्प येत नसतात ते आणावे लागतात व राबवावे लागतात आणि तशी कुवत यंत्रणेमध्ये लागते. हा प्रकल्प कुणा एकट्याच्या फायद्यासाठी नसून संपूर्ण गावाच्या फायद्यासाठी आहे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जर नवीन योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात येत असेल तर गावाच्या कोणत्याही कोपऱ्यात त्या राबवा व गाव विकासाला चालना द्या. ग्रामस्थांना चांगले वाईट नक्कीच कळते. वाईट कार्य करायला वेळ लागत नाही आणि हा गुण सर्वांमध्ये असतो. परंतु चांगले लोक चांगले कार्य करतात फक्त काही दुर्दैवी लोक वाईट करण्याचे कार्य करतात. तेव्हा समस्त गावाच्या वतीने हात जोडून काही वाईट प्रवृत्तींना विनंती आहे की, तळ्याच्या योजनेत कोणीही आडकाठी आणू नये. गावातील अनेक महिलांना अजूनही पाण्यासाठी वन वन फिरावे लागते, गावामध्ये बरेच ठिकाणी पाईपलाईन झालेली आहे परंतु प्रत्यक्षात त्या पाईपलाईन मधून पाणी खूप कमी वेळेस येतांना दिसते. या नवीन तळ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक क्षमतेत ही वाढ होईल व गावाला संपूर्ण वर्षभर पिण्याच्या तसेच वापरासाठी कमतरता भासणार नाही. हा प्रकल्प कुणा एका कुटुंबासाठी किंवा कुणा एकट्या व्यक्तीसाठी नाही हा प्रकल्प संपूर्ण गावाच्या भल्यासाठी आहे आणि या कार्यात बाधा आल्यास योग्य वेळी योग्य पावले गावातील लोकांकडून उचलण्यात येतील. जी मंडळी ती कोणीही असो या योजनेसाठी आपला वेळ व व्यवस्थापन करत आहेत त्यांना काम करू द्या ही विनंती. कळकळ फक्त यासाठी आहे की योजनेसाठी लागणारा निधी देखील मंजूर झालेला आहे, योजना देखील मंजूर झालेली आहे आणि असे प्रकल्प वारंवार आणणे अवघड असतं. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांकडे बघितले असता आपलेही गावाचा विकास हा रथाच्या चाकाप्रमाणे व्हावा अशी अपेक्षा एक गावकरी या नात्याने बाळगतो. जर एखादे कार्य चांगले करता येत नसेल तर निदान होणाऱ्या कामात अडथळा निर्माण करू नका असे आवाहन शशिकांत वक्ते यांनी केले आहे.


