कोपरगाव प्रतिनिधी
अलिकडच्या काळात मानवी वसाहतीवर बिबटयासह हिंस्रप्राण्यांचे प्राणघातक हल्ले कोपरगांव तालुक्यात मोठया प्रमाणांत वाढले असुन २१ एप्रिल रोजी भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर परिसरातील माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांनी शेजारच्या कु-हे यांच्या मालकीच्या शेळीला बिबटयाच्या तावडीतुन वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
याबाबत माजी सरपंच यादवराव संवत्सरकर म्हणाले की, माझे शेता शेजारील कु-हे यांच्या मालकीची शेळी बिबटयाने ओढून आपल्या शेतात आणली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जाग आली, वस्ती नजिक रानडुक्कर असावे असा संशय आल्याने त्यांनी हातात तात्काळ बॅटरी आणि शस्त्र घेतले व घराच्या बाहेर येवुन त्यांनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकत मोठ मोठयाने आरोळ्या मारण्यास सुरूवात केली. रानडुक्कर सदृश्य प्राणी चक्क बिबट्या निघाला. बिबटया आणि त्यांचे अंतर अवघे पाच ते सात फुटाचे होते. प्रथमदर्शनी रानडुक्कर असावे असा संशय आला पण प्रत्यक्षात बिबटया शेळीवर झडप घालत होता, त्याच्या तावडीतुन शेळीला वाचविण्याचा खुप प्रयत्न केला पण यश आले नाही, आरडाओरड केल्याने बिबटयाने नारंदी नदीकडे धूम ठोकली, सकाळ झाल्यावर वन विभागाच्या अधिका-यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. शेळीला वाचविता आले नाही याची हळहळ त्यांनी व्यक्त केली. सध्या शिंगणापुरसह अन्य परिसरात बिबटयाची मोठी दहशत पसरली आहे. रात्री अपरात्री शेतकरी वर्गासह अन्य नागरिक घराच्या बाहेर पडण्यास धजावत नाही. उन्हाळयाचा कडाका सध्या प्रचंड वाढला आहे, गरम वातावरणामुळे नागरिक उघडयावर झोपण्यांस धजावत नाही. वनविभागाच्या अधिका-यांनी तसेच पोलिस विभागाने रात्रीच्यावेळी ग्रामिण भागात गस्त वाढवुन या घटनातुन शेतकऱ्यांचे नागरिकांचे जीव वाचवावे.


