
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार!! संचालक बाळासाहेब वक्ते
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे चालू झाले असले तरी जेऊर कुंभारी सह तालुक्यातील शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार सवाल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रसिद्धी पत्रकात उपस्थित केला आहे.
कोपरगाव तालुक्यात २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन,कपाशी, मका,फळबागा आदी सह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्व डाटा गोळा केला होता.त्याला अनेक महिने उलटून गेले असुन मोठ्या प्रतीक्षेनंतर शासनाने मदत देऊ केली परंतु जेऊर कुंभारी मंडळातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आजूबाजूच्या मंडळामध्ये काही शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचे ऐकवयास मिळते परंतु तेवढी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसणार आहे का ?असा सवाल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.


