

कोपरगाव प्रतिनिधी
बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षण मिळवण्यातही अडचणी आल्या, पण या सर्व परिस्थितीला न जुमानता आंबेडकरांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीही झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले होते. डॉ. भीमराव आंबेडकरांनी समाजातील दीनदलितांना समानता मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरूणांचे जीवन बदलले असल्याचे प्रतिपादन युवा नेते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त युवा नेते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी कोपरगाव येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षक पद्मकांतजी कुदळे, कोपरगांव काँग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र साबळे, नितीनराव शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस तालुकाध्यक्ष छोटू पठाण, प्रशांत अहिरे, अब्बास सय्यद, चंद्रहार जगताप, चंद्रकांत बागुल, विजय जाधव, ज्ञानेश्वर पाटिल, आदी उपस्थित होते.


