Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedशैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारीत अभ्यास तयार करणे गरजेचे!! -डॉ. पराग काळकर

शैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारीत अभ्यास तयार करणे गरजेचे!! -डॉ. पराग काळकर

कोपरगाव प्रतिनिधी

 कौशल्य शिक्षण ही काळाची गरज असून शैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारीत अभ्यास तयार करणे गरजेचे असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी म्हटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालयातील “२०२० राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी-बहुविद्याशाखीय शिक्षण ” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, कर्नाटक येथील प्राध्यापक डॉ. मल्लाप्पा कोंढणापूर, संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, बाळासाहेब बारहाते यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी डॉ. पराग काळकर बोलत होते.ते पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुरुवात जरी २०२० मध्ये झाली तरी महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी २०२३ पासून करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे होणाऱ्या बदलाची माहिती घेऊन ते सक्षमपणे कसे राबवता येईल यासाठी ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी स्थानिक संधी शोधून त्यानुसार कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामीण भागातच राहून उपजीविकेचे साधन निर्माण करू शकतो व पदवी मिळविण्यासाठी त्याला कुठेही घरापासून लांब जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी बरोबर उपजीविकेचे साधनही निर्माण होईल व विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोळपेवाडी सारख्या ग्रामीण भागात महाविद्यालय सुरु केले. शहरातील महाविद्यालयांप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील दोन वर्ष कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असतांना सोशल मीडियावर जास्त रमला व ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील खालावली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापेक्षा जास्तीत जास्त ऑफ लाईन शिक्षणावर भर देणे गरजेचे असून त्या दृष्टीने महाविद्यालय प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.डॉ. मल्लाप्पा कोंढनापुर यांनी कर्नाटक राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना आलेल्या अडचणी नमूद केल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. गणेश चव्हाण व वाणिज्य विभागातील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर संतोष पगारे यांनी नवीन शैक्षणिक धोरण बदल व अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या याबाबत विस्तृतपणे कार्यशाळेत चर्चा केली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आष्टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना विद्यार्थ्यांचे डिजिटल क्रेडिट कसे नोंदविले जातील याबाबतची माहिती दिली.या राष्ट्रीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्राचार्या डॉ. सौ विजया गुरसळ यांनी केले.कार्यशाळेचे कामकाज समन्वयक प्रा.विनोद मैंद व प्रा. पांडुरंग मोरे यांनी पाहिले.
फोटो ओळ – सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘राष्ट्रीय कार्यशाळा’ उद्घाटन प्रसंगी डॉ.पराग काळकर, प्रा. डॉ. मल्लाप्पा कोंढणापूर, संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,बाळासाहेब बारहाते, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ आदी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!