
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हददीतील रवंदे गावचे शिवारातुन शेतकरी शालिनी संजय कदम यांच्या मालकीची तांबडया रंगाची १० हजार रुपये किंमतीची शेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने सोमवार दि १३ मार्च रात्री १० वाजता ते मंगळवार दि १४ मार्च २०२३ रोजीचे २.३० वाजेच्या दरम्यान चोरुन नेली होती. त्याबाबत कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३२ / २०२३ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास कोपरगाव तालुका पोलीसांनी करत गुन्ह्यातील आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या असल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
अधिक माहिती देतांना देसले यांनी सांगितले की, सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, तीन अनोळखी इसम हे एक डिस्कव्हर मोटार सायकल व तिला तांबडया रंगाची शेळी बांधलेली आहे व त्यांचे मोटार सायकलमधील पेट्रोल संपल्याने ते रोडवर उभे आहेत. ही बातमी मिळाल्याने सदर बातमीची खात्री करण्यासाठी पोलिस पथक सरकारी वाहनांसह रवाना केले.
पोलीस पथक हे अहमदनगर मनमाड रस्त्याच्या टोलनाक्याकडुन नाटेगावकडे जात असताना त्यांना हकीगतीप्रमाणे तीन इसम हे मोटार सायकल व शेळी सह मिळुन आले त्यांना ताब्यात घेवून नाव गाव पत्ते विचारले असता, त्यांनी त्यांची नावे लक्ष्मण लहु पवार वय २४ वर्षे, सागर राजेंद्र मोरे वय १८ वर्षे व भिमा रामदास मोरे वय १८ वर्षे सर्व रा. निमगाव मढ, ता येवला असे सांगितले त्यांचेकडे मिळुन आलेल्या तांबडया रंगाचे शेळीबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता, त्यांनी सदरची शेळी रवंदा गावच्या शिवारातुन रात्रीच चोरुन आणल्याची कबुली दिली.
सदर आरोपींकडुन पोलीसांनी ४५ हजार रुपये किंमतीची मोटार सायकल व चोरीस गेलेली १० हजार रुपये किंमतीची शेळी असा एकुण ५५ हजार रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन चोरी सारखा गंभीर गुन्हा केवळ ४ तासात कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पोहेकॉ संदिप बोटे, पोकॉ युवराज खुळे, पोकॉ जयदिप गवारे व चालक पोकॉ चंद्रकांत मेढे यांनी केली आहे.


