



कोपरगाव प्रतिनिधी
२००७ सालची गोष्ट.. सकाळी कोल्हे साहेबांच्या संपर्क कार्यालयातून मला फोन आला. फोनवर साहेबांनी भेटायला बोलावल्याचा निरोप आला.फोन ठेवताच मनामध्ये विचार आला तो म्हणजे साहेबांनी नेमकी कशासाठी बोलवले असेल. माझा आणि साहेबांचा तसा जुना संबंध होता. आरपीआयच्या माध्यमातून चळवळीत काम करत असताना कुठलीही अडचण आली तरी ती अडचण सांगितल्यानंतर तात्काळ अडचण सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि मदत करणारे आमच्या हक्काचे ठिकाण म्हणजेच साहेब. गेली वीस वर्षे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य असल्यापासून समाजासाठी काम करत होतो.आज साहेबांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर मी लवकर तयार होऊन साहेबांचे कार्यालय गाठले. मी आल्याचा निरोप मिळाल्यानंतर साहेबांनी मला कार्यालयात बोलावून घेतले आणि माझ्या तब्येतीची आणि नंतर माझ्या कामकाजाविषयी चौकशी विचारणा केली. त्यानंतर साहेबांनी मला सांगितले की दीपक पोहेगाव जिल्हा परिषदेचा गट आता मागासवर्गीय समाजासाठी राखीव झाला आहे. तर आता जिल्हा परिषदेसाठी तुमच्या समाजातून प्रतिनिधित्व करणार एखादे व्यक्तीचे नाव सुचव. तेव्हा मी तात्काळ साहेबांना सांगितले की साहेब आपण जो कोण्ही उमेदवार द्याल त्याचं काम प्रामाणिक करून त्याला निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू त्यानंतर साहेबांनी एक स्मितहास्य करून तूच उभा राहा की मग असे म्हटले. तेव्हा मी माझी आर्थिक परिस्थितीची कल्पना साहेबांना देताना म्हटलो की,साहेब माझ्यासाठी हे थोड कठीण वाटतं. तेव्हा साहेब मला म्हणाले की, तुझे काम चांगले व प्रामाणिक आहे. समाजामध्ये वावरणारा कार्यकर्ता म्हणून तुझी ओळख आहे आज संधी चालून आली आहे तर आलेल्या संधीचे सोने करण्यात काय हरकत आहे मी तुझ्या पूर्णपणे पाठीशी आहे काहीही काळजी करू नकोस. साहेबांच्या या वाक्याने माझाही आत्मविश्वास जागा झाला कारण चळवळीमध्ये गेले वीस वर्षे काम करताना साहेब पाठीशी असल्यानंतर कुठलेही काम पूर्णत्वास नक्की जाणार हा माझा अनुभव होता. मग मी साहेबांना माझा होकार कळवून निघालो. त्यानंतर साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी गटातील दिग्गज आणि जेष्ठ व्यक्तींच्या बैठका घेऊन पोहेगाव गटासाठी दीपकला आपण उभा करणार आहोत आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेणार आहोत असं सांगून साहेबांनी मला खरोखर जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आणले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला न्याय मिळावा व संधी मिळावी यासाठी साहेबांनी जे काही केलं ते आजही आणि यापुढेही अविस्मरणीय आहे. खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या अनेक मागासवर्गीय कार्यकर्त्यांना साहेबांनी विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. चळवळीसाठी चळवळीतील कार्यकर्त्याना साहेबांनी नेहमीच सर्वोत्परी मदत केली. साहेब आमदार, मंत्री असताना कोपरगांव तालुक्यात विवीध गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहावे यासाठी विशेष सहाय्य केले. त्यांनी गोर गरीब मागास वर्गीय समाजाला कधीच अंतर दिले नाही. सर्व समाजातील नेत्यांना साहेबांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होते. त्यामुळे साहेबांची निधनाची वार्ता समजताच आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनाही दुःखद धक्का बसला. आठवले साहेबांना साहेबांविषयी विशेष प्रेम होते. आरपीआयच्या नगर जिल्ह्यातील कुठल्याही कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून कोल्हे साहेबांना आमंत्रित करण्यात यावं असा आठवले साहेबांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यामुळे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आरपीआयच्या वतीने श्रीरामपूर येथे आठवले साहेबांनी श्रद्धांजली सभा घेऊन साहेबांसोबतच्या विविध आठवणी आणि साहेबांनी केलेले सहकार्य सर्वांसमोर सांगितले.खऱ्या अर्थाने साहेब हे मागासवर्गीय समाजाला नेतृत्वाच्या विविध संधी उपलब्ध करून देणारे आधारवड होते. अशा या महानेत्यास विनम्र अभिवादन….!
आर पि आय प्रेदेश सचिव दिपकराव गायकवाड. जेऊर कुंभारी
जाहिरात



