
कोपरगाव प्रतिनिधी
काल कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार विजय बोरूडे यांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाला अपरात्री दिलेल्या भेटी दरम्यान महिला कर्मचाऱ्याला अपशब्द वापरले, विनयभंग केला म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला मात्र त्या रात्री कर्तव्यात असलेले पण रुग्णालयात गैरहजर असलेले कर्मचारी, डॉक्टर तसेच हजर असून, कर्तव्याचे दरम्यान खोलीचे द्वार बंद करून झोपलेल्या कर्मचाऱ्यांना देखील तात्काळ बडतर्फ, निलंबीत करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रात संजय काळे यांनी पुढे म्हटले आहे की,हा गुन्हा दाखल होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह केला. जर तहसिलदारांनी गुन्हा केला असेल तर त्यांचेवर गुन्हा दाखल होऊन ते बडतर्फ झालेच पाहिजे परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तहसिलदार ग्रामीण रुग्णालयात अपरात्री भेटीला गेले असता त्यांचे गाडीचे चालकाने त्यांचे संभाषणाचे व दवाखान्यातील कर्मचाऱ्यां सोबतचे दोन व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केले आहे. एका चित्रफिती मध्ये दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला डॉक्टर किंवा नर्स असले बाबत प्रश्न विचारला तो कर्मचारी व तहसिलदार यांनी नर्सला मोठ्या आवाजात हाका मारल्या. नर्स एका रूम मध्ये दार बंद करून झोपलेल्या होत्या.
तहसिलदारांनी रुग्णांना देखील त्रास दिला असे समाज माध्यमांवरील बातम्यात वाचण्यात व ऐकण्यात आले म्हणजे रुग्णालयात रुग्ण असताना कर्तव्यातील कर्मचारी रात्रपाळीला झोपले कसे ? ते देखील खोलीचे दार बंद करून त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे, त्याची दखल कोण घेणार ? असा सवाल देखील काळे यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
तहसिलदार यांनी महिला कर्मचाऱ्याला ड्युटी रजिस्टर मागितले. त्यात ग्रामीण रुग्णालयात ५२ चा स्टाफ असताना, रात्रीच्या वेळेस संपूर्ण दवाखाना केवळ एकाच नर्सच्या भरवश्यावर सोडल्याचे त्या चित्रफितीत स्पष्ट दिसते. कर्तव्यात असलेले इतर डॉक्टर व स्टाफ दवाखान्यात नसल्याचे तहसिलदारांनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे . तेवढ्या रात्री त्यांनी मेडीकल सुप्रीटेंडेंट अर्थात वैद्यकिय अधिक्षक यांना फोन केल्याचे चित्रफितीत स्पष्ट दिसते. जर शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून डॉक्टरांसाठी निवास आवारातच बांधलेले आहे. तर डॉक्टर आवारात का निवास करीत नाही ? त्या रात्री वैद्यकिय अधिक्षक यांनी आपले मुख्यालय कसे सोडले ?
जर त्यांनी मुख्यालय आपल्या परवानगीने सोडले तर त्यांनी चार्ज कुणाकडे दिला होता.? रात्री दवाखान्यात एक देखील डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नाही याला ग्रामीण रुग्णालय म्हणायचे काय ? असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
कर्तव्यातील खासगी प्रॅक्टीस करणारे व ग्रामीण रूग्णालयात केवळ काही तासा साठी ऑन कॉल येणाऱ्या डॉक्टरांना देखील तात्काळ बडतर्फ करावे. अशा प्रकारे तहसिलदारांनी केलेल्या स्टींग ऑपरेशनला जर उत्तर आपले विभागातील संघटीत गुन्हेगारी देत असेल तर माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर आपण आयपीसी ३५३ च लावणार?
तहसिलदारांवर गुन्हा दाखल करून आपण आपले कार्यालयाचे कर्मचाऱ्यांना तर अभय देत नाही ना? जर तहसिलदारांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण रात्रीच्या वेळेस कर्तव्यात असलेले पण रुग्णालयात हजर नसलेले सगळेच गुन्हेगार आहेत. त्यांचे वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.
अन्यथा दिनांक २८/०२/२०२३ रोजी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेश द्वारासमोर गैरहजर डॉक्टर, कर्मचारी यांचेवर फौजदारी गुन्हा व बडतर्फ करण्याचे मागणी साठी तसेच वैद्यकिय अधिक्षक यांनी मुख्यालय सोडले बाबत गुन्हा दाखल होण्यासाठी ‘ढोल बजाव सत्याग्रह’ करणार असल्याचा इशारा संजय काळे यांनी दिला आहे.


