Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर्वार्थाने विकसित ग्राम हे देशाच्या वैभवात भर ठरते!!-स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके

सर्वार्थाने विकसित ग्राम हे देशाच्या वैभवात भर ठरते!!-स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके

कोपरगाव प्रतिनिधी

    ग्रामिण भागात विकासाची कामे होत असतांना त्यात दिशादर्शकता महत्वाचे असून आरोग्य, स्वच्छता,शिक्षण,शेती,पाणी,रस्ते यासह जैविक विविधता असलेल्या वनस्पती,वन्यजीव यांची जपवणुक होण्याची आवश्यकता आहे.भौतिक विकास साधतांना नैसर्गिक समतोल आणि ग्रामीणबाज असलेली परंपरागत मुल्ये आजही महत्वाची आहे.आपले अनुकरण इतर गावे करतील अशा पध्दतीने ग्रामविकासात तरुणांनी योगदान द्यावे.सर्वार्थाने विकसित ग्राम हे देशाच्या वैभवात भर ठरत असल्याचे मनोगत स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी एका व्याख्यानात केले आहे.
    श्री सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरात व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना शिबिरार्थींना प्रमुख वक्ते स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी ग्रामविकास या विषयावर मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संतोष देशमुख होते.प्राचार्य रमेश सानप,ग्रामसेवक रफिक सय्यद, कार्यक्रम अधिकारी डॉ.बंडेराव तऱ्हाळ,डॉ. महेश दिघे, डॉ.बाळासाहेब वाघमोडे, डॉ.सुरेश काळे,प्रा.डि.जे.गाडेकर,प्रा.डी.एस. गोर्डे,ग्रंथपाल योगेश कोळगे, गोरक्षनाथ मिसाळ, बाबासाहेब पगारे आदि उपस्थित होते.
       व्याख्यानात पुढे बोलतांना वनश्री सुशांत घोडके पुढे म्हणाले, सार्वजनिक कार्य करतांना छोटी छोटी कामे करणाऱ्या माणसांचे महत्व असते. पाणी, वनराई या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत याचे महत्त्व सांगून त्यांनी स्वतःबरोबर झाडांची रोपे आणून  गणपती मंदिर परिसरात वृक्षारोपण केले.पत्र संस्कृती जपली पाहिजे. असे सांगत,विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड कसे असते व ते किती महत्त्वाचे असते याचे महत्त्व सांगितले. स्वतःबरोबर ११० पोस्ट कार्ड आणून सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकांशी या पोस्टकार्ड द्वारे संवाद साधण्यासाठी मुलांना ती लिहायला लावून पोस्ट कार्ड संस्कृती जपा,असा संदेश दिला.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष  संतोष देशमुख यांनी दहेगावची आदर्श गाव वाटचाल कशी झाली. याबाबत माहिती दिली. तसेच पुणे विद्यापीठाचे विभागीय समन्वयक डॉ. बाळासाहेब गायकवाड यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.  
     कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश काळे यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले तर कार्यक्रम अधिकारी डॉ.बंडेराव तऱ्हाळ यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अक्षदा भोसले हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!