
कोपरगाव प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यंतचे काम पूर्ण झालेले आहे. या नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यतच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रविवार (दि.११) रोजी होणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून मिळत आहे. कोपरगाव तालुक्यातील इंटरचेंजला जगप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र शिर्डीचे इंटरचेंजला नाव देण्यात आलेले आहे. या समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या असून या समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यातील अंतर जवळपास ३० किलोमीटरचे आहे. त्यामुळे या शिर्डी इंटरचेंजला शिर्डी सह शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज असे नाव देण्यात यावे. तसेच या शिर्डी इंटरचेंज परिसरात होणाऱ्या टोल प्लाझाला देखील शिर्डी बरोबरच कोपरगावचे देखील नाव जोडले जावून शिर्डी-कोपरगाव टोल प्लाझा असे नाव देण्यात यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी पर्यतच्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन (दि.११) रोजी होणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवार (दि.०४) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते कोपरगाव -शिर्डी पर्यतच्या पूर्ण झालेल्या कामाची शिर्डी पर्यंत पाहणी केली. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून त्यांना कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या भावना निवेदनाच्या माध्यमातून सांगितल्या.मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केलेली मागणी पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, महेश लोंढे, सुनील लोहकणे आदी उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डी कोपरगाव पर्यंत काम पूर्ण होवून उद्घाटन देखील होणार आहेत. मात्र कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या व अनेक नागरिकांच्या अजूनही काही अडचणी सुटलेल्या नाहीत. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असून या अडचणी देखील सोडवाव्यात अशी मागणी देखील आ. आशुतोष काळे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. फोटो ओळ – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील शिर्डी इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज व शिर्डी टोल प्लाझाला देखील शिर्डी-कोपरगाव टोल प्लाझा नाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देतांना आ. आशुतोष काळे.


