
कोपरगाव प्रतिनिधी
सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचे स्मरण करून ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात खूप मोठे काम केलेले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांची तिसरी पिढी उत्तम काम करत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी स्नेहलताताई कोल्हे आमदार होत्या. मीही आमदार होतो, मंत्री होतो. अनेकदा वारसा हा पित्याकडून मुलाकडे येत असतो; पण सासऱ्याकडून सुनेकडे जनतेची सेवा करण्याचा वारसा मिळाला हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे केले. आकाशाएवढी उंची असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या कुटुंबीयाची सून म्हणून त्यांनी प्रवेश केला; पण विधान भवनात, मंत्रालयात वावरताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही गर्वाचा, अहंकाराचा लवलेशही दिसला नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, आजही ते हे काम करत आहेत.
कोपरगावात पुन्हा भाजपच्या विजयाचा झेंडा फडकणार
भारतीय जनता पक्षाचा जो देशभक्तीचा विचार आहे. ‘नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो पुण्यभूमी जियेच्याय कामी, पडो देह माझा सदा ती नमी मी’ ही देशभक्तीची भावना आहे. तुमच्या मनातील हा संकल्प पूर्ण व्हावा अशी मी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. गेल्या निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे अगदी थोड्या मतांनी पराभूत झाल्या; परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे या भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास आज मला तुमच्याकडे पाहून वाटतो आहे. कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलताताई कोल्हे यांच्या रूपाने भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास करून आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.


