
कोपरगाव प्रतिनिधी
मनाचे समाधान आणि आवड या दोन गोष्टीमुळे गेल्या सात वर्षापासुन कोपरगांव संजयनगर भागातील क्षत्रिय समाजाचे सुनिल नारायण कोसंदल (५४) हे तुळजापुर, कोल्हापूर, माहुरगड आणि वणी सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तीपिठांची सायकल परीक्रमा करतात याही वर्षी त्यांनी समाजातील असंख्य दार्तुत्ववानांच्या सहकायने तेरा जिल्हयांतुन पंचेचाळीस दिवसात १७९५ किलोमिटर या देवींची परीक्रमा सायकलवर पुर्ण केली त्याबददल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवासात त्यांना काही ठिकाणी आर्थीक अडचणींना सामोरे जावे लागले पण त्यांनी तीन हजार फुगे विकून त्यावर मात केली.श्री. सुनिल नारायण कोसंदल हे संजयनगर कोपरगांव येथील रहिवासी असुन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले त्यानंतर सुतारकी, खुर्च्या विणणे, बाजार यात्रा काळात कटलरी सामानाची विक्री, मोलमजुरी करीत जीवनातील संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे जुनी सायकल असुन २६ सप्टेंबर घटस्थापनेला त्यांनी कोपरगांव पंचक्रोशीतील ग्रामदैवतांचे दर्शन घेवुन साडेतीन शक्तीपिठ देवी परीक्रमा यात्रेला खिशात जेमतेम पैसे घेवुन प्रारंभ केला.पर्यावरण साधा, इंधन वाचवा”बेटी बचाव बेटी पढाव, असा संदेश देत शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या परिक्रमेस हिरवा झेंडा दाखवत त्यांना रवाना केले होते, व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आर्थिक मदतही केली होती. रस्त्यात काय अडचणी येतील याचा विचारही त्यांनी केला नाही मात्र साडेतीन शक्तीपिठांचा आर्शिवाद त्यांच्या पाठीशी बळकट होता. साईबाबांची शिर्डी, कोल्हार, शनि शिंगणापुर, कानिफनाथ मढी, मायंबा, मोहटादेवी, येरमळादेवी, तुळजापुर, सोलापुर, नरसोबाची वाडी, आप्पाची वाडी, अदमापुर बाळूमामाची मेंढरं, कोल्हापुर, ज्योतिबाचा डोंगर, पंढरपुर, अंबेजोगाई, परळीवैजनाथ, माहुरगड, औंढा नागनाथ, अंतापुर तहाराबाद आणि वणी सप्तशृंगी या प्रवासात ते दररोज सत्तर ते ऐंशी किलोमिटर सायकल चालवुन सायंकाळी देवळात मुक्कामी थांबले. पंचेचाळीस दिवसाच्या प्रवासात त्यांचा अनेकांनी सत्कार करून पाहुणचार केला. ९ नोव्हेंबर रोजी त्यांचे कोपरगांवात आगमन झाले यशस्वी प्रवासाबददल त्यांचा अनेकांनी सत्कार केला. सन २०११ पासुन ते साडेतीन शक्तीपिठ देवी परिक्रमा करत आहेत. सायकलवर अष्टविनायक यात्राही त्यांनी केलेली आहे. या प्रवासात सटाणा येथे त्यांनी टायर, ट्युब बदलले, पावसाचा तडाखा अनेक ठिकाणी बसला. क्षत्रिय समाज बांधवांनी त्यांचा सोलापुर, वसमत, जालना व येवला येथे सत्कार केला. प्रवासात काही ठिकाणी त्यांना कडु गोड अनुभव आले. सायकल प्रवासात ते ज्या ठिकाणी मुक्कामी थांबत तेथे विश्रांतीकाळात त्यांना अनेकवेळा पाय दाबण्याचा भास व्हायचा पण उठुन पाहिल्यावर समोर कुणीच दिसत नसे हा परमेश्वरी प्रसाद असावा असे म्हणून ते दुस-या दिवशी पुन्हा सायकल प्रवास सुरू करत ही आठवण सांगतांना त्यांचे मन भरून आले.


