
कोपरगाव प्रतिनिधी
आपल्या पक्षाचे सरकार असल्यावर कसा निधी मिळवायचा हे मतदार संघातील जनतेने मागील अडीच वर्षात पाहिले आहे आणि आपल्या पक्षाचे सरकार नसतांना देखील मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविता येवू शकतो हे देखील २००४ ते २०१४ या १० वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात मतदार संघातील जनतेने अनुभवले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार जरी पायउतार झाले असले तरी यापुढील काळात देखील कोपरगाव मतदार संघाच्या विकासावर कोणताही परिणाम होवू देणार नाही. मतदार संघाच्या विकासासाठी वेळ पडल्यास सरकारपुढे लोटांगण देखील घेईल अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरात सुरु झालेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी ना.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यामुळे मतदार संघाच्या विकासावर परिणाम होईल का? असा प्रश्न ना. आशुतोष काळे यांना विचारला त्या प्रश्नाला उत्तर देतांना मतदार संघाच्या विकासासाठी सरकारपुढे लोटांगण घेण्याची तयारी दाखविली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी १००० कोटीच्या वर निधी आणला आहे. या निधीतून रस्ते, पाणी, आरोग्य सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदार संघात विकास कामे चांगल्या प्रकारे सुरु असून अनेक कामे पूर्ण देखील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले मात्र त्याचा कोपरगाव मतदार संघाच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याची स्पष्टोक्ती ना. आशुतोष काळे यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. सरकार कोणत्या पक्षाच्या आहे आहे हे महत्वाचे नाही त्यासाठी विकासाची मानसिकता महत्वाची आहे. मागील अडीच वर्षापासून मतदार संघाला विकासाची चटक लागली आहे. ती यापुढे देखील तशीच राहील. त्यामुळे मला विश्वास आहे,राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी मतदार संघासाठी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र तरी देखील मला वाटलेच की, मतदार संघासाठी निधी कमी पडतो त्यावेळी मात्र मतदार संघाच्या विकासासाठी वेळ पडल्यास सरकारपुढे लोटांगण देखील घेण्याची माझी तयारी राहील मात्र मतदार संघाचा विकास कधीही थांबू देणार नाही अशी ग्वाही मोठ्या आत्मविश्वासाने ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.


