
कोपरगाव प्रतिनिधी
सगळ्या समाजातील नागरिकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत सामावून घेण्याची पवार साहेबांची शिकवण आणि विचार कोपरगावने तंतोतंत पाळला आहे. पवार साहेबांचे ना.आशुतोष काळे यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. विकासाची तळमळ असणारा राष्ट्रवादीचा आमदार मतदार संघाचा कसा विकास करू शकतो याचे उत्तम उदाहरण नामदार आशुतोष काळे यांनी अडीच वर्षातच कोपरगावचा आदर्शवत विकास करून दाखवून दिले आहे. यापूर्वीचे कोपरगाव आम्ही पाहिले आहे आणि आताचे कोपरगाव पाहत असतांना विकासाच्या बाबतीत त्यांनी कोपरगावचा कायापालट करून निर्माण केलेली विकासाची प्रतिमा शरद संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर घेवून जाणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित शरद युवा संवाद यात्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथे आली असता त्यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले,शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी जिल्हा युवक सचिव कृष्णा आढाव, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, कार्याध्यक्ष वाल्मिक लाहीरे, संदीप कपिले आदी मान्यवरांसह कोपरगाव तालुका राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक व युवक काँग्रेसचे कोपरगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना मेहबूब शेख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असतांना अहमदनगर जिल्हा आणि कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावला कार्यक्षम आमदार मिळाला आहे. भाजपकडून वातावरण निर्मिती केली जाते की देशाचा जो विकास झाला तो २०१४ नंतरच झाला ७० वर्षात देशात कोणताही विकास झाला नाही असं सांगणारे भाजप कपड्याचा शोध देखील २०१४ नंतरच लागला एवढंच म्हणायचे बाकी राहिले आहे अशी कोपरखळी मारली. भारतीय जनता पार्टी ही भारत जलाव पार्टी आहे. जातीजातीमध्ये द्वेष निर्माण करायचा, भांडणे लावायचे काम भाजप करीत आहे. यापुढील काळात निवडणुकीच्या वेळी जातीय दंगली घडवायच्या किंवा भारत पाकिस्तान युद्ध करायचं असं काम भाजप कडून होणार आहे. भाजपची पहिली बी टीम एम आय एम होती, दुसरी सिटीम मनसे आहे. या दोन्ही टीमला महाराष्ट्र पेटविण्याची सुपारी देण्यात आली आहे.मात्र त्यांचे हे प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र असून पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार नामक सह्याद्री महाराष्ट्रात खंबीरपने उभा आहे. त्यामुळे पवार साहेबांवर आरोप आणि आघात केले जात आहेत. शरद पवार हे नेता नसून विचार आहे.पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप केले जातात मात्र पवार हे जातीवादी नसून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी घेतलेला पुढाकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध जाती-धर्माच्या व्यक्तींना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला एसटीचे आरक्षण, ओबीसीचे आरक्षण मान्य नसून संविधानाला न मानणारा भाजप पक्ष आहे. देशात द्वेषाचे आणि जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांना एका छत्राखाली आणण्याची ताकत शरद पवार साहेबांमध्ये असून २०२४ ला ही ताकद पवार साहेब दाखविल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेबांनी आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी समाजासाठी दिलेलं योगदान हे त्या समाजाच्या तरुणाईला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी पटवून देऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बनवा व पवार साहेबांचे विचार तरुण वर्गात पोहोचवा असे आवाहन केले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना ना.आशुतोष काळे म्हणाले की,पवार साहेबांनी देशाच्या व राज्याच्या राजकारणात पाच दशकांपेक्षा जास्त काळ दिलेलं योगदान शरद संवाद यात्रेच्या माध्यमातून युवा वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु असून त्याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. सध्या देशात धर्माचा अभिमान आणि गर्व असल्याच्या भडकावू बातम्या पेरल्या जात असल्या तरी जगातील कोणताही धर्म दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची शिकवण देत नाही.त्यामुळे तरुणाईने यापासून दूर राहावे व नागरिकांना देखील अशा भडकावू विचारांपासून दूर ठेवन्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची गरज आहे. आपल्याला चांगले रस्ते पाहिजे, शेतकऱ्यांना वेळेवर वीज आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले पाहिजे. उद्योग सुरळीतपणे सुरू राहतील त्यासाठी विकासाचे मूलभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे. यासाठी पवार साहेबांनी सातत्याने काम केले आहे. त्यांचे विचार समाजापर्यंत आणि घराघरात घेऊन जाण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर व शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
चौकट :- एवढं मोठं राजकीय वलय असतांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही,अभिमान नाही असं ना. आशुतोष काळेंच व्यक्तिमत्व असून त्यांना कधीही राग येत नाही. राज्याच्या सर्व आमदारांना मी जवळून पाहत आलो आहे मात्र २८८ आमदारांपैकी सदाबहार व्यक्तिमत्व कोणाचं असेल तर ते ना.आशुतोष काळेंचे आहे. मतदार संघात त्यांनी केलेला विकास पाहता नगरपालिका,पंचायत समिती या तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणारच आहेत यात शंका नाही मात्र २०२४ ला नामदार आशुतोष काळे ५० हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे.- मेहबूब शेख.माझा स्वभाव शांत आहे. तो माझ्या स्वभावाचा भाग आहे त्यामुळे मला सहसा राग येतच नाही. मात्र ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी ठोषास ठोसा देण्याची माझी तयारी असते. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरलेली असते त्यामुळे जर मला राग आला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही.-ना.आशुतोष काळे.


