Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपाच्या दावणीला बांधलेल्या कोल्हे सैनिकांनी आघाडी धर्माचा शहाजोगपणा शिकवू नये!!-सुनील गंगुले

भाजपाच्या दावणीला बांधलेल्या कोल्हे सैनिकांनी आघाडी धर्माचा शहाजोगपणा शिकवू नये!!-सुनील गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी
 
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून तीनही पक्षाचे कार्यकर्ते सरकारच्या व आपल्या पक्षाच्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. मात्र कोपरगाव शहरातील काही शिवसेनेचे नगरसेवक हे भाजपाच्या तंबूत गेले आहेत. कोल्हेंची मर्जी संपादन करण्यासाठी शहरविकासाला विरोध करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पालिकेच्या जबाबदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जावून मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती त्यांना कायद्याने त्याची शिक्षा मिळाली आहे. मात्र आपल्या करणीचे खापर दुसऱ्यावर फोडून आज त्यांना महाविकास आघाडीच्या धर्माची आठवण झाली याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पदोपदी कोंडीत पकडणाऱ्या भाजपला कोपरगावात देखील एकत्र राहून जशास तसे उत्तर न देता जे स्वार्थासाठी स्वत: भाजपाच्या दावणीला बांधले आहेत त्या कोल्हे सैनिकांनी आघाडी धर्माचा शहाजोगपणा शिकवू नये असे सडेतोड उत्तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्वतःला शिवसैनिक समजणाऱ्या मात्र कोल्हेंच्या दावणीला बांधलेल्या कोल्हे सैनिक संजय सातभाई यांना दिले आहे. 
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सत्तेपासून दूर असलेला भाजप सत्ता नसल्यामुळे मागील तीन वर्षापासून सातत्याने शिवसेनेला टार्गेट करीत आहे. अशावेळी सच्चा शिवसैनिक या नात्याने प्रत्येक शिवसैनिक शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहून पक्षाचे आदेश पाळत आहेत. मात्र स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणारे कोपरगावातील काही शिवसेनेचे गद्दार नगरसेवक हे मागील तीन वर्षापासून भाजपाच्या दावणीला बांधले गेले आहेत ही शिवसेनेशी गद्दारी नाही का? २८ विकासकामांना विरोध करून न्यायालयातुन स्थगिती आणणारे शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवणारे शहरातील नागरिकांचे गुन्हेगार नाहीत का? असा सवाल गंगुले यांनी विचारला आहे. 
कायदा हा सर्वाना सारखाच आहे. त्यामुळे कुणीतरी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कायदा हातात घेणार असेल तर त्या त्याठिकाणी कुणीही असले तरी त्याला कायद्याने शिक्षा होणारच कारण कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांना जर मारहाण होत असेल तर अधिकाऱ्यांना देखील न्याय मागण्याचा अधिकार आहे.त्या माध्यमातून दोषींना शासन झाले आहे. त्यामुळे आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडून आज त्यांना तीन वर्षानंतर कोल्हे सैनिकांना आघाडीचा धर्म आठवला आहे. 
            राज्यातील महाविकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या व नेतृत्वाच्या पाठीशी आहेत. मात्र कोपरगावातील शिवसेनेचे नगरसेवक असलेले कोल्हे सैनिक हे मागील तीन वर्षापासून भाजपाच्या दावणीला जावून बसले व आजही ते भाजपच्याच दावणीला बांधले आहेत ते स्वत:ला कोणत्या तोंडाने शिवसैनिक म्हणतात हेच मोठे आश्चर्य आहे. ना. आशुतोष काळे सच्चा शिवसैनिकांसोबत राहून आघाडीचा धर्म पाळत आहेत. मात्र कोल्हे सैनिक असलेल्या सातभाईंनी कोपरगावात आघाडी धर्म पाळला का? याचा प्रश्न आपल्या मनाला विचारावा. नेहमीच जिकडे सत्तेच्या घुगऱ्या, तिकडे आपला मोर्चा वळविणाऱ्या संजय सातभाई यांना ना. आशुतोष काळे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? स्वत: कोल्हे सैनिक असलेले आघाडीचा धर्म शिकवत आहेत हे हास्यास्पद आहे असा टोला गंगुले यांनी संजय सातभाई यांना शेवटी लगावला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!