
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी व रवंदे परिसरातील शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत असलेल्या अनेक समस्या मार्गी लागणार असून वारी व रवंदे सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी १ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
वारी व रवंदे परिसरातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणारे वारी व रवंदे सबस्टेशनचे पॉवर रोहीत्र ३.१५ एम. व्ही.ए. क्षमतेचे होते. या भागाला वीजपुरवठा करणारे या सबस्टेशनचे पॉवर रोहीत्र सातत्याने ओव्हरलोड होवून वीज पुरवठा खंडीत होत होता. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी ना. आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याबाबत सविस्तर माहिती घेवून या दोनही सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे या सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु होता.
पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ हे शनिवार (दि.३०) रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. आशुतोष काळे यांनी वारी व रवंदे परिसरात वीज ग्राहकांना येत असलेल्या अडचणीकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून वारी व रवंदे सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधी मिळावा अशी आग्ग्रही मागणी केली. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या दोनही सबस्टेशनसाठी १ कोटी ४० लाखाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून या सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता ३.१५ एम. व्ही.ए. वरून ५ एम. व्ही.ए. पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे सबस्टेशन ओव्हरलोड होत असल्यामुळे वीज ग्राहकांना वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे व पूर्ण क्षमतेने मिळणार आहे.
त्यामुळे वारी उपकेंद्राच्या माध्यमातून वारी, भोजडे, हनुमानवाडी (कान्हेगाव), डोणगाव शिवार व परिसर तसेच रवंदे उपकेंद्राच्या माध्यमातून मळेगाव थडी, रवंदा शिवार व परिसरातील वीज ग्राहकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. जनता दरबारात या दोनही सबस्टेशन व त्यावर असलेल्या फिडरवरील ज्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी ना. आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात मांडल्या. त्या अडचणी ना. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनता दरबाराचा उद्देश सफल झाला असल्याचे दिसून येत आहे. त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे या सबस्टेशनच्या फिडरवरील वीज ग्राहकांच्या वतीने आभार मानले आहे.


