
कोपरगाव प्रतिनिधी
कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतल्यापासून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या भक्तांना खराब रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांना निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या रस्त्यांचा २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करून सर्व रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण शुक्रवार (दि.२९) रोजी शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शना साठी आले होते. यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी त्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देतांना साईभक्तांना खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे ना. आशुतोष काळे यांनी त्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, दोन वर्ष कोरोना संकटामुळे साईभक्त शिर्डीला आले नाही. मात्र शासनाकडून निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी वाढू लागली आहे.
शालांत परीक्षा संपल्यामुळे लवकरच शाळांना सुट्ट्या लागणार आहे त्यामुळे शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या अजूनच वाढणार आहे. साईभक्तांना श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून सर्व सुविधा देण्यात येत आहेत मात्र शिर्डीला जोडणाऱ्या खराब रस्त्यांमुळे साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांना निधी मिळाल्यास हे रस्ते प्रशस्त होवून साईभक्तांना शिर्डीला येण्यासाठी त्रास होणार नाही. त्यासाठी या सर्व २२ रस्त्यांना निधी मिळावा यासाठी २०२२ च्या पुरवणी बजेटमध्ये समावेश करून जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी ना. आशुतोष काळे यांनी यावेळी केली. सदर मागणीस ना. अशोक चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी आ. सुधीर तांबे साहेब, आ. लहु कानडे, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, सुहास आहेर,अविनाश दंडवते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव पी.बी. भोसले, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी,कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करतांना अध्यक्ष ना. आशुतोष काळे.


