
कोपरगाव प्रतिनिधी
एन.यु.एच.एम.अंतर्गत अर्थात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी आरोग्य केंद्र मिळावे यासाठी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मान्यता दिली असून कोपरगाव शहरासाठी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
जीवघेण्या कोरोना महामारीने नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत किती सजग राहिले पाहिजे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी ना. आशुतोष काळे यांचे प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाच्या आरोग्याच्या बाबतीत असलेल्या योजनांचा फायदा मतदार संघातील जनतेला मिळवून देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे एन.यु.एच.एम.अर्थात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविले होत्ते. त्या प्रस्तावाची केंद्र शासनाने योग्य दखल घेवून कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर केले आहेत.
या अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये १ डॉक्टर, १ परिचारिका, १ सहाय्यक कर्मचारी व १ औषध निर्माता असे एकूण ४ आरोग्य कर्मचारी नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देणार आहे. जवळपास १५ ते २० हजार लोकसंख्या विचारात घेवून हि अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर देण्यात आली आहेत. यामध्ये कोपरगाव शहरातील खडकी व परिसर, अंबिकानगर व परिसर तसेच सुभाषनगर व परिसर या ३ ठिकाणी हि अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर उभारली जाणार आहे अशी माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोरोनाच्या काळात ना. आशुतोष काळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योग्य नियोजन करून आरोग्य विभागाला सर्वोतोपरी मदत केल्यामुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करून आणले त्याबद्दल शहरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. पाठविलेल्या प्रस्तावाची दखल घेवून राज्य शासनाने केंद्र शासनाकडून कोपरगावला ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करून दिल्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. ना. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, इम्तियाज अत्तार, शैलेश साबळे, किशोर डोखे, विजय शिंदे, चांदभाई पठाण, योगेश नळे, अमोल गिरमे, संदीप वाघ तसेच खडकी, अंबिकानगर व सुभाषनगर येथील कार्यकर्त्यांनी परिसराची संयुक्त पाहणी केली.


