
कोपरगाव प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन देखील या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळत नव्हती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामीण पाठपुरावा योजनांचा प्रश्न रखडलेला होता. या गावातील बहुतांशी गावे हि मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. विशेषतः महिला भगिणींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, वारी-कान्हेगाव, मळेगाव थडी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्याबाबत काही दिवसांपूर्वी त्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी वरील सर्व गावातील पाणीपुरवठा योजना ५ कोटीच्या पुढे असल्यामुळे या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वर्ग केल्या असल्याचे प्रधान सचिवाच्या निदर्शनास आणून देत या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर गावांच्या पाणीपुरवठा योजनांना देखील मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असून या योजनांना देखील लवकरात लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे सांगितले आहे. मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्याबदल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे आ.आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.
मळेगाव थडी व वारी-कान्हेगावचा वर्षानुवर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे दोनही गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून महिला भगिणींनी आ.आशुतोष काळे यांचे विशेष आभार मानले आहे. काही दिवसांपूर्वी वारी येथे रस्ता भूमिपूजन कामासाठी आ.आशुतोष काळे गेले असता त्यांनी वारी-कान्हेगावचा पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही वारी-कान्हेगाव ग्रामस्थांना दिली होती. दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळविली आहे. यावरून शब्द पाळणारा नेता अशी प्रतिमा आ.आशुतोष काळे यांची तयार झाली आहे.


