
कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी गावामध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्यां महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्ती प्रज्वलित करून संजयनगर मधून बुद्धं सरणं गच्छामी, धम्मम सरणं गच्छामी, संघम सरणं गच्छामी या त्रिसरणाचा उल्लेख करत अभिवादन फेरी काढण्यात आली. आर पी आय आठवले प्रणित भीम साम्राज्य सेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. शेकडो महिला, पुरुष,युवक व बालकांनी या अभिवादन फेरीत सहभाग नोंदवला.अभिवादन फेरी पूर्ण करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक मैदान या ठिकाणी सामुहिक तिषरण, पंचशील व भिमस्तुती पठण करूनअभिवादन सभा घेण्यात आली.
अभिवादन सभेस संबोधित करताना आर पी आय चे प्रदेश सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड म्हणाले की, डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे नावाने फक्त घोषणा देण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. डॉ. बाबासाहेबांनी दाखविलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मार्गावर चालून आपली सर्वांगीण प्रगती साधुन, समाजाला व देशाला पुढे न्यायला हवे. यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना भीमसाम्राज्य सेने चे कार्य व संघटन चांगले असून धम्म कार्यात त्यांना समाजाचे वतीने नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले.


