
कोपरगाव प्रतिनिधी
शहरात गेल्या कित्येक दिवसापासून गोवंश हत्या होत होती. संबंध महाराष्ट्र भर हा विषय चर्चिला जात होता याबाबत नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर अखेर कोपरगाव नगरपरिषद व शहर पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत शनिवार दि ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील अवैध कत्तलखाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने हटविण्यात येत आहे.प्रशासनाच्या या बेधडक कारवाई मुळे गाय प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव नगरपालिकेने दि २६ ऑक्टोबर २०२१ ला या कत्तलखान्यावर कारवाई करण्याची जाहिरात वर्तमानपत्रात देत संजयनगर, सुभाषनगर, आयशा कॉलनी, बैलबाजार रोड या भागातील अवैध कत्तलखान्याचा चालकांना कळविले होते. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्या पूर्वीच आपली अवैध बांधकामे तत्काळ काढून घेण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील या कत्तलखान्याचा मालकांनी काढलेले नव्हते.

त्यामुळे शनिवारी पालिका प्रशासनाने अगदी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कठोर कारवाईचा बडगा उगारत कोपरगाव शहर पोलिस, तालुका ग्रामिण पोलिस तसेच शिर्डी पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सकाळपासून धडक मोहीम सुरू केली. या कारवाई वेळी नागरपलिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, उपनिरीक्षक भरत नागरे आदिंसह पाच पोलिस अधिकारी अधिकारी, साधारणपणे पणे ५० च्या वर शहर, तालुका, शिर्डी पोलिस स्टेशन चे सशस्त्रधारी पोलीस कर्मचारी, कोपरगाव पालिकेच्या विविध विभागाच्या विभागप्रमुखांसह प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. या अतिक्रमण मोहिमेसाठी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर, दोन डंपर, सात मालवाहू रिक्षा, दोन अग्निशामक बंब तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस गाड्यांचा ताफा होता. या बेधडक कारवाई बद्दल कोपरगाव प्रशासनाचे व सर्व पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


