
कोपरगाव प्रतिनिधी
महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना व्हावा. त्यासाठी या योजनेतील काही अटी व शर्तींचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्जमुक्ती बरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, फळबाग फलोद्यान व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद संस्था आहेत. त्या नियमितपणे पीक कर्ज व कृषी कर्जाचा शेतकऱ्यांना नियमित पुरवठा करीत आहेत. त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा. या पूर्वीच्या दोन्ही कर्जमाफी योजनांचा लाभ त्यांना झाला आहे. सध्या जेथे पाऊस पडला तेथे पेरणीच्या तोंडावर बाजारपेठेत बियाणे आणि खतांची टंचाई तसेच मोठ्या प्रमाणावर भेसळीच्या तक्रारी येत आहेत. कृषी विभागाने यावर तात्काळ नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मायगाव देवी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कांद्याच्या बोगस बियाणांमुळे मोठी आर्थिक फसवणूक झाली. कृषी विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केल्या. कृषी विभागाने केलेल्या चौकशीमध्ये आरएसआर सिक्स कॉर्पोरेशन या कंपनीने पुरवलेल्या कांद्याच्या बियाणात तब्बल ८६ टक्के भेसळ असल्याचे उघड झाले . याप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कंपनीचा परवाना कायमचा रद्द करावा आणि कंपनीचे संचालक व दोषी अधिकाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करावी. व मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघासाठी ५ कोटी निधी दिल्याबद्दल महायुती शासनाचे आपण आभार मानीत आहोत.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा हि माझी प्रामाणिक इच्छा आहे. अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे महायुती सरकार मी मांडलेले सर्व विषय निश्चितपणे मार्गी लावेल असा मला विश्वास आहे. – आमदार आशुतोष काळे.


