Tuesday, May 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedआमच्या हक्काच्या निळवंडेच्या पाण्यावर डोळा ठेवणाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करू नये!!-...

आमच्या हक्काच्या निळवंडेच्या पाण्यावर डोळा ठेवणाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करू नये!!- ज्ञानेश्वर गव्हाणे

कोपरगाव प्रतिनिधी

पाच वर्ष सत्ता असतांना कधीही जिरायती गावातील नागरीकांची आठवण आली तर नाहीच याउलट आमच्या हक्काच्या पाण्यावर डोळा ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. त्यामुळे तुम्हाला आमच्या भागातील नागरीकांनी गावात येण्यापासून देखील रोखले होते. याचा तुम्हाला जरी विसर पडला असला तरी आमच्या जिरायती भागातील नागरीकांना विसर पडलेला नाही. आज जिरायती भागात निळवंडे धरणाचे पाणी आले ते फक्त आणि फक्त आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आलेले आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या पाण्यावर डोळा ठेवणाऱ्यांनी योगदान शून्य असतांना श्रेय घेण्यासाठी आटापिटा करू नये असा सल्ला अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कोल्हे गटाला दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी पुढे असे म्हटले आहे की, जोपर्यंत निळवंडे कालव्याचे पाणी उपलब्ध झाले नव्हते तोपर्यंत कोपरगाव तालुक्यातील जिरायती गावांना माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी स्वत: आर्थिक झळ सोसून उजनी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित ठेवून जिरायती गावांना दुष्काळाच्या झळा जाणवू दिल्या नाही. मात्र २०१४ ते २०१९ या पाच वर्षात ज्यांच्याकडे तालुक्याची सत्ता होती त्यांनी कधी या योजनेकडे ढुंकून सुद्धा पाहिले तर नाहीच याउलट आमच्या हक्काच्या निळवंडेच्या पाण्यावरच त्यांनी डोळा ठेवला होता.त्यामुळे आमचे हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आम्ही २०१९ ला त्यांना घरी बसवून आमची काळजी करणारा आणि आमच्या वेदना जाणणारा नेता आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने निवडून दिला.आमदार आशुतोष काळे यांनी देखील मतदार संघातील तमाम जनतेसह आमचाही विश्वास सार्थ ठरवून उजनी उपसा जलसिंचन योजना तर कार्यान्वित ठेवली. परंतु त्याच बरोबर निळवंडेचे पाणी जिरायती गावागावात कसे पोहोचविता येईल व त्यातून निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावातील पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी वेळप्रसंगी कालव्याच्या भरावावर भर उन्हात ठाण मांडून बसलेले आमदार आशुतोष काळे जिरायती गावातील नागरीकांनी पाहिलेले आहे. ज्या वेळी पाणी पोहोचविण्यासाठी अडचणी येतील त्या त्यावेळी स्वत:ची यंत्रणा उभी करून व सातत्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जिरायती गावातील सर्व बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. जिरायती गावातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले हे आमदार आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नांचे फलित आहे. त्यामुळे आमच्या काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादाराबाद या जिरायती गावातील मागील तीन पिढ्यांची निळवंडेच्या पाण्याची प्रतीक्षा आता कायमची संपली आहे.नुकतीच टंचाई आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे सुरु असलेल्या आवर्तनातून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दयाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली होती. त्या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून पाटबंधारे विभागाला सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे भरून देण्याच्या सूचना केल्यामुळे पाझर तलाव, बंधारे, गावतळे भरण्याचे काम सुरु आहे मात्र अजून सर्व बंधारे भरलेले नाहीत. कारण शहापूर बंधाऱ्यात पाणी येणे बाकी आहे व बहादराबादच्या केटीवेअरमध्ये अजून पाणी पडायचे आहे आणि वेस व अंजनापूर बंधाऱ्यामध्ये नुकतेच पाणी सुरु झाले आहे. बहादरपूरमध्ये पाणी आले असले तरी अजून बंधारे भरलेले नाही. मात्र याची माहिती न घेता केवळ फुकटचे श्रेय घेण्यासाठी कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी योगदान शून्य असलेल्या नेत्याचे फुकटचे कौतुक करणे हास्यास्पद आहेच परंतु त्यापेक्षा नेत्याने योगदान नसतांना आपली पाठ थोपटून घेणे हे त्यापेक्षा जास्त हास्यास्पद आहे.उतावळा नवरा अन गुडघ्याला ———असं करू नका कारण ए पब्लिक है, और समझदारभी है, ए सब जानती है असा टोला सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी शेवटी लगावला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!