
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील ऐतिहासिक राघोबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस येऊन अस्तित्वाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता. याची गांभीर्याने दखल घेवून या वाडा संवर्धनासाठी आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. त्यातील ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या दुसऱ्या हफ्त्याच्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
राघोबादादा वाड्याची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगावच्या इतिहासाच्या पाऊलखुणा बुजतात की काय असा प्रश्न इतिहास प्रेमी व कोपरगावकरांना पडला होता. मात्र आ. आशुतोष काळे यांनी राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून एकूण ७ कोटी २७ लक्ष ७० हजार रुपये निधी उपलब्ध केला होता. यातील पहिला हफ्ता प्राप्त होऊन वाड्याच्या सावर्धानाचे काम चालू असताना बुधवार (दि.१८) रोजी दुसऱ्या हफ्त्याच्या ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
शहराची अर्थव्यवस्था समृद्ध होण्यासाठी पर्यटन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर भविष्याचा वेध घेत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने राघोबादादा वाडा या वास्तूच्या संवर्धनाचा निर्णय घेतला असून, या उपक्रमामुळे कोपरगाव शहराकडे पर्यटकांची पावले वळण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक व्यवसायवृद्धीवर दूरगामी सकारात्मक परिणाम होईल. या उपक्रमामुळे कोपरगावकर व इतिहासप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.
यापुढील काळात मतदार संघातील इतरही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. ऐतिहासीक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी एकूण ७.२७ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांचे आभार मानले आहे.


