Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावकरांना कोल्हे गटाने दिलेला 'शब्द' हवेत; पहिल्याच अर्थसंकल्पातून सवलती गायब!सत्ता मिळताच वचनांचा...

कोपरगावकरांना कोल्हे गटाने दिलेला ‘शब्द’ हवेत; पहिल्याच अर्थसंकल्पातून सवलती गायब!सत्ता मिळताच वचनांचा विसर; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शब्द देतो, सर्वानुमते निर्णय घेतला आहे, आता फक्त सत्ता द्या अशा भावनिक साद घालत आणि घोषणांचा भडीमार करत सत्ता मिळवणाऱ्या कोल्हे गटाचा खरा चेहरा अवघ्या ६० दिवसांतच जनतेसमोर आला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द आणि दाखवलेला विश्वास पहिल्याच सर्वसाधारण सभेत हवेत विरल्याचे पाहायला मिळत असून कोल्हे गटाकडून कोपरगावच्या जनतेची शुद्ध फसवणूक होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहरात ज्या महिलांच्या नावाने घरे आहेत त्यांच्या घरपट्टीत ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले होते. तसेच कोपरगाव नगरपरिषदेच्या शाळेत ज्या कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत त्यांच्या घरपट्टी व पाणीपट्टीत २० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. या आश्वासनांमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांनी कोल्हे गटावर विश्वास टाकला. मात्र बुधवारी (दि. २६) कोपरगाव नगरपरिषदेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला आणि कोपरगावकरांचा भ्रमनिरास झाला.
या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिलांच्या ५० टक्के सवलतीसाठी किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी जाहीर केलेल्या २० टक्के सवलतीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात या सवलतींचा साधा उल्लेखही नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी सभेत सडेतोड सवाल उपस्थित केला. निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे? अशी विचारणा केली असता सत्ताधाऱ्यांनी त्यांचे बोलणे थांबवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या मंदिरात जर लोकप्रतिनिधींना जनतेच्या हिताची चर्चा करू दिली जात नसेल तर सत्ताधारी नेमका कोणता विकास करत आहेत? असा संतप्त प्रश्न आता कोपरगावकर विचारत आहेत.
सत्ता स्थापन होऊन ६० दिवस उलटून गेले तरी कोल्हे गटाने नागरिकांना दिलेले एकही वचन पूर्ण केलेले नाही. खोटं बोल पण रेटून बोल या वृत्तीने निवडणुकीत मते लाटली गेली मात्र आता अंमलबजावणीच्या वेळी सोयीस्कर मौन पाळले जात आहे. भूलथापा देऊन मिळवलेली सत्ता कोपरगावच्या प्रगतीसाठी की केवळ खुर्चीसाठी अशा उलटसुलट चर्चा कोपरगावात रंगल्या आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!