
कोपरगाव प्रतिनिधी
शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवांना मोठे महत्त्व असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनारी व परिसरातील इतर दोन शाळांच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची ‘अगत्य’ कृषी ॲग्रो पर्यटन केंद्र येथे एकदिवसीय क्षेत्रभेट उत्साहात पार पडली.
विविध उपक्रमांची मेजवानी
चेतन कुलकर्णी आणि सुनील कुलकर्णी, संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या पर्यटन केंद्रात विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये प्रामुख्याने वॉटर पार्क, रेन डान्स आणि वॉटर फॉलमध्ये मुलांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. परदेशातील दुर्मिळ पक्षी आणि प्राणी जवळून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. बैलगाडी, टांगा, ट्रॅक्टर आणि सफारी जीपमधून फिरताना मुलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.जादूचे प्रयोग, साहसी राईड्स, वॉच टॉवर आणि बोटिंग यांमुळे सहलीत अधिकच रंगत आली.
”अगदी माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, रुचकर नाष्टा आणि जेवण मिळाले. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी खूप काही नवीन शिकले.”
महाराष्ट्रभरातून वर्षभर पर्यटकांची पसंती मिळवणाऱ्या या केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे चविष्ट जेवण यामुळे विद्यार्थी तृप्त झाले.
ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्रीमती. शबाना शेख मॅडम व केंद्र प्रमुख श्री.रावसाहेब लांडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.सोनारी शाळेचे मुख्याध्यापक लतिफखान पठाण आणि सहशिक्षक सोमनाथ काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेली ही सहल पालकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.


