
जेऊर कुंभारी वार्ताहर
अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत शेतकरी राजा मेहनतीने शेती पिकवतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतीपंप, केबल व इतर साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला आहे. जेऊर कुंभारी परिसरात अशाच प्रकारची आणखी एक घटना उघडकीस आली आहे.
जेऊर कुंभारी शिवारातील सर्वे नंबर ९४/६/१ येथील शेतकरी शिवाजी मच्छिंद्र वक्ते यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी शेतीसाठी वापरला जाणारा गार्डनर कंपनीचा फिल्टर चोरून नेला आहे. सदर शेतातील विहिरीजवळ सायपनला बसवलेला हा फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसवण्यात आला होता. विहिरीतून मोटारद्वारे येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी या फिल्टरचा वापर करण्यात येत होता.
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता शेतीला पाणी भरून झाल्यानंतर मोटार बंद केली असता फिल्टर व्यवस्थित स्थितीत होता. मात्र दुसऱ्या दिवशी, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर विहिरीवर गेले असता फिल्टर गायब असल्याचे दिसून आले. तसेच मोटारच्या स्टार्टर्सच्या वायर काढलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
आजूबाजूला शोध घेतला असता फिल्टर मिळून आला नाही. सुमारे २० हजार रुपये किमतीचा गार्डनर कंपनीचा फिल्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
शेतीसाहित्य चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा चोरट्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी परिसरात नियमित गस्त व कडक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी शिवाजी मच्छिंद्र वक्ते यांनी केली आहे.


