Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedडाव्या-उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करून अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा!!-आ.आशुतोष...

डाव्या-उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करून अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा!!-आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत गोदावरी कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी सुरु असलेल्या डाव्या-उजव्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करा आणि अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पार पडलेल्या डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटबंधारे विभागाचे अधिकारी व डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली.यावेळी पार पडलेल्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्न समजावून घेवून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत सुरु असलेल्या डाव्या-उजव्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे मातीकाम सध्या काही ठिकाणी प्रगतीपथावर असून कालव्यांचे अस्तरीकरण होणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.हा संभ्रम दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरु असलेले दुरुस्तीचे मातीकाम व कुठे अस्तरीकरण होवू शकते याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून प्रेझेंटेशन करून घेत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, कोपरगाव मतदार संघात गोदावरी कालव्यांचे दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करा. आवर्तन सुरु असतांना ज्या ठिकाणी कालव्यांचे लिकेज आढळून येईल त्याचे परत फोटो काढून रेकॉर्ड तयार करा. लाभ धारक शेतकऱ्यांसमवेत फेर सर्व्हे करून ज्या ठिकाणी अस्तरीकरण करण्याची खरोखर आवश्यकता असेल त्या ठिकाणी अस्तरीकरण न करता पर्यायी मार्ग शोधावा. जर कुठलाच पर्याय उपलब्ध नसेल तर तेवढ्याच जागेत ५० मीटर पर्यंतच अस्तरीकरणाचा विचार करावा व त्याबाबत शेतकऱ्यांशी सल्ला मसलत करून व त्यांना विचारात घेवून त्याचा अहवाल माझ्याकडे सादर करावा अशा सूचना यावेळी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.धरण क्षेत्रात समाधानकारक पाणी साठा असून रब्बीचे आवर्तन शनिवार (१०) रोजी सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून प्रथम पिण्यासाठी नंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाच्या सबंधित कार्यालयाकडे सादर करावे व पाटबंधारे विभागानेही त्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.मागील वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे सर्व धरणे तुडुंब भरली होती.व लाभक्षेत्रातही पाणी मागणी नसल्यामुळे सिंचनासाठी आवर्तनाची गरज भासली नाही. परंतु यापुढील काळात पिण्याबरोबरच सिंचनासाठी आवर्तनाची गरज भासणार आहे त्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याची बचत करून ०२ रब्बी व ०३ उन्हाळी आवर्तन शेतकऱ्यांना वेळेवर द्यावे व शक्य असल्यास त्यापेक्षा जास्त आवर्तन द्या व आवर्तन सुरु होण्यापूर्वी सर्व चाऱ्या व पोटचाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्या अशा सूचना दिल्या.याप्रसंगी नासिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीम.सोनल शहाणे, उपअभियंता तुषार खैरनार, उपअभियंता विवेक लव्हाट, उपअभियंता प्रशांत ढोकणे, उपअभियंता संदीप पाटील, निवृत्त अधिकारी तात्यासाहेब थोरात तसेच शाखा अधिकारी वैभव गाडेकर, सोहन चौधरी, भूपेंद्र पवार, कुणाल बिऱ्हाडे अविनाश जाधव, श्रीम.शीतल निर्मळ, निखील चौधरी, सुमित शंकूरवार, प्रवीण सुरासे, गणेश कुलकर्णी, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, पद्माकांत कुदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, सचिन रोहमारे, विजयराव जाधव, राजेंद्र खिलारी, कृष्णराव गाडे, सोमनाथ चांदगुडे, पंडितराव चांदगुडे, दौलतराव मोरे, दिलीपराव शिंदे आदी मान्यवरांसह डाव्या उजव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चाऱ्याच्या दुरुस्तीबाबत आ.आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल मागील वर्षी मे महिन्यात गोदावरी उजव्या कालव्यांच्या चाऱ्यांची दुरुस्ती केली त्यानंतर आजपर्यंत कुठेच चाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम झालेले दिसत नाही. चाऱ्यांची दुरुस्ती कधी करता हे माहित आहे का? मे महिन्यानंतर पावसाळा आला, चाऱ्यांमध्ये गबाळ वाढले, हे गबाळ कधी साफ करणार? असा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी विचारल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. मात्र आ.आशुतोष काळे यांनी सर्वच चाऱ्यांच्या दुरुस्ती झाल्या पाहिजेत व सर्व चाऱ्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय पाणी सोडू नका अशा सक्त सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!