
कोपरगाव प्रतिनिधी
साखर उद्योगातील शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांच तर्फे राज्यामध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार तसेच राज्यामध्ये ऊसाचे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते. गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाकरीता मध्य विभागातुन तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार हा साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व उच्च कार्यक्षमतेचे निकष यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.
साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), पुणे यांच्या वतीने साखर क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात त्याप्रमाणे २०२४-२५ च्या गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील अनेक साखर कारखान्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे. कारखान्यास मागील वर्षी २०२३-२४ च्या गळीत हंगामात मध्य विभागातून दुसऱ्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला होता. त्यामध्ये सुधारणा करून अधिक तांत्रिक कार्यक्षमतेचा वापर करून मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार मिळविला आहे.
कारखान्याने मिल मधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक-८६.६%,रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन (RME)-९६.१६,प्रायमरी एक्सट्रॅक्शन-७३.९,बगॅसची बचत % ऊस-८.७७%, गाळप क्षमतेच्या वापरा मध्ये वाढ ८.१२%,बगॅस मधील साखरेच्या व्येयाचे प्रमाण-०.५२,गाळप बंद काळाचे प्रमाण (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल)-०.०%,पाण्याचा वापर % फायबर २६१.९९, साखर उतारा ११.२०% मिळाला होता. या सर्व कामगिरीची दखल घेवून २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मध्य विभागातून प्रथम क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार (दि.२९) रोजी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री ना.दत्तात्रयजी भरणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांचे काटकसरी व्यवस्थापन व नियोजन डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे आधारस्तंभ व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. हि वाटचाल करतांना उत्पादन खर्चात बचत करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा देता येईल याचा सातत्याने विचार व अंमलबजावणी केली जाते.कारखान्याचे दोन टप्यात यशस्वीपणे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करून पूर्ण क्षमतेने गाळप होत आहे. ऊस गाळप करतांना कमीत कमी साखरेचा अपव्यय, बगॅस बचत, स्टीमचा कमीत कमी वापर, साखरेचा दर्जा या सर्व गोष्टीचा अवलंब करून कारखान्याचा कारभार अतिशय काटेकोरपणे सुरु आहे. कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून प्रथम क्रमांकाचा मिळालेला तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे.-आ.आशुतोष काळे (चेअरमन)


