
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कापसाच्या वाती झाल्या असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असलेले हे पीक अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पुढील पीक घेण्याबाबतही शेतकरी संभ्रमात आहेत. काढणीस आलेला कापूस पावसामुळे भिजल्याने उत्पादनात घट झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळीपूर्वीच शेतकरी वर्ग अनुदानाच्या प्रतीक्षेत होता. मात्र जेऊर कुंभारीतील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. “सरकारने आश्वासन दिलं पण हाती काहीच नाही,” अशी खंत येथील शेतकरी शिवाजी मच्छिंद्र वक्ते, शंकर गुरसळ, किशोर गायकवाड, शिवाजी सिताराम वक्ते, कैलास चव्हाण, मधुकर वक्ते यांनी व्यक्त केली. शिवाजी मच्छिंद्र वक्ते म्हणाले, “सातत्याच्या पावसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकही वेचणी झाली नाही, शेतात पाणीच पाणी आहे. मजूर कामाला येत नाहीत. सरकारने अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे.”
सरकारने त्या वेळी महसूल व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. दोन्ही विभागांकडून पिकांचे पंचनामेही झाले. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा, फार्मर आयडी आणि बँक खात्याची सर्व कागदपत्रे सादर केली. तरीही आजतागायत एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. अनेक वेळा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली, मदतीच्या घोषणा झाल्या; पण प्रत्यक्ष मदत मात्र अद्याप हवेतच आहे. त्यामुळे जेऊर कुंभारी परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून “अनुदान मिळणार तरी कधी?” हा प्रश्न त्यांच्या मनात अधिकच ठाण मांडून आहे.



