
कोपरगाव प्रतिनिधी
नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी दैनंदिन त्रासाचा विषय झाला आहे. या महामार्गावरील काम सुरू असलेला पूल बंद पाडल्याने आणि त्यावरील दुरुस्तीचे काम अर्धवट राहिल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा लोखंडी सांगाडा अचानक उचलून नेण्यात आल्याने नागरिकांना या टक्केवारी त्रासाचा बळी ठरावे लागत आहे.भाजपचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत विचारले आहे की, काम बंद पाडणारा आणि ठेकेदाराला धमक्या देणारा आ.का कोण आहे? वाटा न मिळाल्याने अधिकाऱ्यांना धमकावण्याचा आणि कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न कोणत्या राजकीय व्यक्तीच्या बगलबच्च्याने केला का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.नगर-मनमाड महामार्गासाठी शासनाने निधी मंजूर करूनही काही जणांच्या राजकीय लालसेपोटी आणि टक्केवारीच्या मागणीमुळे काम ठप्प झाले आहे का अशी चर्चा रंगली आहे.हे काम वेळेवर पूर्ण झाले असते तर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता, मात्र आ.का च्या प्रतिनिधीने ठेकेदाराच्या माणसांना दमबाजी केल्याने ते काम बंद पडलेले आहे असे आढाव यांनी सांगितले.वाहतूक कोंडीमुळे दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत. लांबच लांब वाहनांच्या रांगा, सण-उत्सव काळात होणारा मनस्ताप, आणि खराब रस्त्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापारी, शाळकरी मुले आणि रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकतात, यामुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. त्यामुळे कामात अडथळा येणाऱ्या त्या आ.का चे दुटप्पी नाटक जनतेने ओळखले आहे.नाटकी दमबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करत दोन दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास योग्य उत्तर संबंधितांना देणार असल्याचे वैभव आढाव यांनी सांगितले आहे.


