Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाणी मागणी अर्ज करूनही हरिसन ब्रँच चारीला पाणी नाहीच !!

पाणी मागणी अर्ज करूनही हरिसन ब्रँच चारीला पाणी नाहीच !!

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यास आवर्तन जाहीर करून पाटबंधारे खात्याने पाणी अर्ज मागवले. पाणी अर्ज स्विकारताना जुनी पाणीपट्टी वसूल केली मात्र आता गोदावरी कालव्यास पाणी येऊन तीन आठवडे उलटूनही पाणी सोडण्यात आले नाही त्यामुळे उभ्या पिकांची होरपळ सुरु असून हरिसन ब्रँच चारीला तातडीने पाणी सोडावे अन्यथा गोदावरी कालवे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला आहे.
महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते यांनी भ्रमणध्वनीवरून पाटबंधारे उपविभागीय अभियंता अरुण निकम यांच्याशी संपर्क साधला असता या आवर्तनात केवळ फळबागांनाच पाणी दिले जाणार असल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी पाणी अर्ज दाखल केले तेव्हा पाटबंधारे खात्याने असे काही सांगितले नाही, त्यामुळे ऐन दुष्काळात केवळ पाणीपट्टी वसुलीसाठीच अर्ज स्विकारून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राहता तालुक्यात सर्वाधिक फळबागा आहेत त्यामुळे तिथे सर्वात जास्त पाणी उपलब्ध होणार आहे. मग हरिसन ब्रँच चारीला पाणीच सोडण्यात येणार नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेऊरकुंभारी, कोकमठाण, चांदेकसारे, डाऊच खुर्द ,पानमळा, पोहेगाव या गावांना हॅरीसन ब्रँच चारीतुन शेतीला नियमित पाणी मिळाल्यामूळे हा भाग आर्थिकदृष्टया सधन म्हणून ओळखला जात होता. परंतु पाटबंधारे खात्याला शेतकऱ्यांची झालेली भरभराट पहावेनाशी झाली की काय? म्हणुन मागील काही वर्षापासून हॅरीसन ब्रँच चारीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यात अनियमतता दिसून
येत आहे. ही चारी सध्या कोरडीठाक पडलेली आहे, शेतकरी तहानलेला आहे. परंतु माय - बाप पाटबंधारे खात्याला या गोष्टींचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे या परिसराचे वाळवंट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे खात्याच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या चारीला पाणी सोडण्यात यावे यासाठी आंदोलने, उपोषणे करण्यात आलीत मात्र, पाटबंधारे खात्याला काहीही फरक नाही. माजी मंत्री स्व.शंकराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या अगोदर झगडे फाटा परिसरात रास्ता रोको करून संबंधीत विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काही अंशी पाटबंधारे विभाग जाग्यावर आला परंतु काही काळानंतर पुन्हा पहीले पाढे पंचावन्न असे या चारीच्या बाबतीत दिसून आले आहे. वर्तमान परीस्थितीत चांदेकसारे, जेऊर कुंभारी सह इतर गावे हॅरीसन बँच चारीकडे डोळे लावुन बसले आहे. उन्हाळी आवर्तन वेळेवर न मिळाल्यामुळे बारामाही पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामूळे, पाण्याअभावी फळबागा व जनावरांचा चारा वाचवणे जिकरीचे होऊन बसले आहे. परंतु पाटबंधारे विभागाकडून अजूनही या चारीला पाणी सोडले जात नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. या अगोदर कालव्याचे पाणी चितळीला पोहचले की दोन तीन दिवसात या चारीला पाणी सुटत होते मात्र आता तेही दिवस राहीले नाहीत. पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या चारीला तातडीने पाणी सोडावे अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक मधुकर वक्ते यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!