Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिळवंडे कालव्यांना गती देवून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा!!- ना. आशुतोष काळेंच्या निळवंडे...

निळवंडे कालव्यांना गती देवून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा!!- ना. आशुतोष काळेंच्या निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.

कोपरगाव प्रतिनिधी

रखडलेल्या निळवंडे कालव्याच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देवून गती दिली आहे. मागील दोन वर्ष जर कोरोनाचे संकट नसते तर निळवंडे कालव्यांची चालू वर्षी म्हणजेच २०२२ मध्येच टेस्टिंग झाली असती. परंतु कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत सापडल्यामुळे हे शक्य झाले नाही. तरीदेखील निळवंडे कालव्यांचे काम प्रचंड वेगाने सुरु आहे हि समाधानाची बाब आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील सर्व निळवंडे कालव्यांच्या कामांना गती देवून निळवंडे कालव्यांचे पाणी कालव्याच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत प्राधान्यक्रमाने पोहोचवा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ज्या टेलच्या भागात पोहोचणार आहे त्या ठिकाणी राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील सुरु असलेल्या निळवंडे कालव्यांच्या कामाची ना.आशुतोष काळे यांनी पाहणी केली. टेलटँक कुठे बांधला जाणार याबाबत सविस्तर माहिती घेवून व स्वत: कामाची पाहणी केली. याप्रसंगी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, टेलपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे हि शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या अशा अनेक प्रश्नांची अधिकाऱ्यांनी नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी. उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सर्व लाभधारक क्षेत्राला पाणी मिळावे यासाठी पाण्याची मोठी बचत करावी लागणार आहे. त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरण व बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था देखील करावी लागेल त्याची मानसिकता शेतकऱ्यांनी आत्तापासूनच करावी.१९७० पासून निळवंडे कालव्यांची कामे सुरु असून तिसऱ्या पिढीला देखील निळवंडेचे पाणी पहायला मिळाले नव्हते. मात्र राज्यात   महाविकास आघाडी सरकार आल्यापासून निळवंडे प्रकल्पाला जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी आजपर्यंत १०५६ कोटी निधी दिला आहे. निळवंडे कालव्यांच्या कामांना गती देण्यासाठी निळवंडे समितीचे सदस्य असलेल्या मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील विरोधी पक्षाचा आमदार असतांना निळवंडेच्या कामाला गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे या सर्वांचे देखील निळवंडे कालवे तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने माझे देखील प्रयत्न राहणार असून सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढून लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी घेवून जायचे आहे. निळवंडे कालवा कृती समितीने देखील निळवंडेच्या कामासाठी रस्त्यावर, न्यायालयात व शासनदरबारी मोठा संघर्ष केला असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मोठे प्रकल्प होतात, कालवे होतात, चाऱ्या होतात मात्र मात्र वर्षभरानंतर शेतीच्या मशागतीच्या वेळी या चाऱ्या बुजल्या जातात अशी परिस्थिती होवू देवू नका असे लाभधारक शेतकऱ्यांना आवाहन केले.   
यावेळी निळवंडे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट, कनिष्ठ अभियंता निखिल आदिक, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, नानासाहेब शेळके, ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, उत्तमराव घोरपडे, सुरेश वाघ, दिपक वाघ, शिवाजीराव वाघ, अण्णासाहेब कोते, सुरेश लहारे, मुरलीधर शेळके, रुपेंद्र काले, जालींदर लांडे, सुभाष निर्मळ, शंकरराव लहारे, अनिल कोते,साहेबराव आदमाने,अनिल रक्टे, अंजाबापू रक्टे, बाबुराव थोरात, प्रभाकर गुंजाळ,बाबासाहेब गुंजाळ, राऊसाहेब कोल्हे,किसनराव पाडेकर, लक्ष्मणराव थोरात तसेच वाकडी, धनगरवाडी, चितळी व दिघी निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निळवंडे कालव्याच्या कामाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना. आशुतोष काळे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!