
कोपरगाव प्रतिनिधी
देशातील सर्वात प्रगतीशील व एकात्मिक विचारांचे राज्य अशी आपल्या महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. देशाच्या विकासात्मक जडणघडणीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक योगदान फार मोठे आहे. आपल्या राज्याची एकता,अखंडता टिकवून ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य विकासाची अशीच अनेक शिखरे गाठत राहील व संपूर्ण जगासमोर आपला आदर्श निर्माण करेल असा विश्वास श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय कोपरगाव येथे ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ अशा अनेक संतांच्या आचारांनी, विचारांनी पावन झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली गेली. अनेक महात्मे, स्वातंत्र्यसैनिकांना इथल्या भूमीने जन्म दिला. अशा या महान महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला असल्याचे सांगत स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना अभिवादन करून कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, राजेंद्र वाकचौरे,रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे,सौ. मायादेवी खरे, बाळासाहेब रुईकर,राजेंद्र जोशी, शैलेश साबळे, राजाभाऊ बागुल, दिलीप घोडके, सुरेश गोरे, पं.स. शाखा अभियंता उत्तमराव पवार, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, कारागृह अधीक्षक चंद्रकांत कुलथे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


