
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदार संघात पावसाने उघड दिल्यामुळे खरीप पिके वाचवण्यासाठी शेतीपंपाच्या विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.परंतु ठरलेल्या वेळेत करण्यात येणारा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वीज पुरवठ्याबाबत शेतकरी व नागरीकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता एन.एम.सोनवणे, व्हि.जे.बोरसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.आर. नानोटे, सहाय्यक अभियंता ए.सी.बोडखे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव मतदार संघात ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून उपलब्ध पाण्यातून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.उष्णता वाढल्यामुळे घरगुती विजेची मागणी पण वाढली असतांना महावितरण कडून सायंकाळी ६ ते ९ वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरीकांच्या व छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या अडचणी वाढल्या असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत कृषी पंपांना करण्यात येणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच घरगुती वीज ग्राहकांना देखील पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करा.
कोपरगाव मतदार संघात मागणीनुसार वीज रोहित्र उपलब्ध करून देत आहे. तरी देखील जे वीज रोहित्र कायम नादुरुस्त होतात त्यांची स्वतंत्र यादी तयार करा. वादळामुळे तुटलेल्या,लोंबणाऱ्या विजेच्या तारा आणि वाकलेले पोल दुरुस्त करण्याच्या कामांना गती द्या.व नागरीकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी अशा सूचना देवून मतदार संघात सुरु असलेल्या सोलर प्रकल्पाचा आमदार आशुतोष काळे यांनी आढावा घेतला.


