
कोपरगाव प्रतिनिधी
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, कोपरगावच्या वतीने भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या रक्तदान शिबिरास संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, रक्तदान ही केवळ सेवा नसून एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याचे महान कार्य असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.रक्ताची गरज कोणत्याही क्षणी, कोणालाही भासू शकते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया, कर्करोग तसेच विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत मोलाचे ठरते. ही जाणीव ठेवून युवक, महिला आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला.मा.आ.स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे आणि आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे महा रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी,अभ्यासू नेतृत्व आणि निर्णयक्षम कार्यशैलीसाठी ओळखले जातात. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, जलयुक्त शिवार, मेट्रो, समृद्धी महामार्ग, गुंतवणूक, उद्योगवाढ, शेतकरी व महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख धोरणे आणि जनतेशी सातत्यपूर्ण संवाद ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये मानली जाता.याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक,भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य, सेवाभाव आणि जनकल्याणाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.


