
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघातील संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी जलजीवन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला होता. परंतु सदर निधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नसल्याने अधिकच्या निधीची गरज होती. या योजनेला अधिक निधी मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले होते. याची दाखल घेऊन महायुती शासनाने संवत्सर पाणी पुरवठा योजनेच्या निधीत वाढ करून ४ कोटी ५७ लाखांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
जलजीवन मिशन योजने अंतर्गत संवत्सर गावाकरिता पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु या पाणी पुरवठा कामाची निविदा कमी दराने प्रसिद्ध झाली असून प्रत्यक्ष कामात तांत्रिक बदल करण्यात आले आणि वस्तू व सेवाकरातही वाढ झाल्याने योजनेच्या मूळ किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे सदर योजनेसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या योजनेचा सुधारित प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला होता.
या पाणी पुरवठा योजनेच्या निधीत वाढ होऊन सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता व त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन शासनाने संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ५७ लाख निधीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे पाणी पुरवठा योजनेच्या कामातील सर्व तांत्रिक आणि आर्थिक अडचण दूर होऊन पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे संवत्सर ग्रामस्थांमध्ये समाधानचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.


